'कुतूहल'फळांचा राजा आंब्याचे...

    🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭आंबा म्हंटलं की तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही, मग तो कच्चा असो की पिकलेला.
फलाहार हा आरोग्याच्या दृष्टीने एकदम सुयोग्य असा आहार आहे. मनुष्याला फळे आवडतातच. विविध ऋतुंमध्ये उपलब्ध होणारी सर्व फळे हा निसर्गाचा चमत्कारच आहे. त्यामध्ये ऐन उन्हाळ्यात आणि पावसाळ्याच्या सुरुवातीपर्यंत उपलब्ध असणारे आंबा हे फळ सर्वांप्रमाणे  माझेही आवडते फळ आहे.मलाच काय तर आबालवृद्धांना आवडणार गोड फळ म्हणजे आंबा.
आंब्याला संस्कृत मध्ये आम्र असे म्हणतात. आंब्याची आगमनाची चाहूल आंब्याच्या झाडाला मोहोर आल्यावर समजते. त्या मोहोराचा सुद्धा एक मंद  असा सुवास असतो. ह्या फळाच्या आगमनाची वर्दी पक्षी सुद्धा देतात. कोकीळ हा पक्षी त्यावेळेस कुहू... कुहू .…करून गाणी म्हणत असतो.
कच्च्या आंब्याला कैरी म्हणतात. कैरी ही नेहमीच चवीला आंबट असते.
आंबा हा विषुवृत्तीय प्रदेशात आढळणारे झाड आणि फळ आहे. अवीट गोडीच्या या फळाला महाराष्ट्रात कोकणचा राजा म्हणतात. 
 आंबा फळाचा राजा आहे.
आंबा  हे भारत आणि पाकिस्तान या देशांचे राष्ट्रीय फळ, बांग्लादेशाचे राष्ट्रीय झाड आणि फिलिपाईन्सचे राष्ट्रचिन्ह आहे. 
जगाच्या आंबा उत्पादनापैकी ५६ टक्के आंब्याचे उत्पादन एकट्या भारतात होते. भारतात आंब्याच्या जवळपास १३०० जातींची नोंद आहे. परंतु २५ ते ३० जाती या व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या आहेत. नीलम व हापूस यांच्या संकरीकरणातून कोकण कृषी विद्यापीठाने रत्ना ही जात विकसित केली आहे. गुजरात राज्यातील केशर हे वाण महाराष्ट्रातील कोरडवाहू पट्ट्यामध्ये अतिशय लोकप्रिय आहे. दक्षिण भारतातील तोतापुरी, आंध्रप्रदेशामध्ये बैंगणपल्ली, उत्तर प्रदेशामध्ये दशेरी, लंगडा, दक्षिणेत नीलम, पायरी, मलगोवा या जाती प्रसिद्ध आहेत. याव्यतिरिक्त संशोधन केंद्राने दशेरी व नीलम यांच्या संकरामधून आम्रपाली आणि नीलम व दशेरी यांच्या संकरामधून मल्लिका ही जात विकसित केली आहे. कोकण विद्यापीठाने बिनकोयीची सिंधू ही जात विकसित केली आहे. पश्चिम महाराष्ट्रमध्ये केशर या आंब्याच्य जातीची लागवड वाढली आहे.

हापूस ही एक आंब्याची जात आहे. हापूस आंबा त्याच्या उत्तम स्वाद व अप्रतीम गोडीसाठी प्रसिद्ध आहे. रत्नागिरी आणि देवगड परिसरातील हापूस जगप्रसिद्ध आहे.

कृत्रिमरीत्या आंबा पिकविण्यास 'आंब्याचा माच लावणे' किंवा आंब्याची आढी लावणे असे म्हणतात. यासाठी एखाद्या खोलीत वाळलेले तणस वा भाताचे वाळलेले गवत (पिंजर) पसरून त्यावर झाडावर पिकण्यास सुरुवात झालेल्या कैऱ्या ठेवतात. त्यावर पुन्हा गवत वा तणसाचे आच्छादन करतात.अशा प्रकारे साधारणतः १०-१५ दिवसात, झाकला गेल्यामुळे निर्माण झालेल्या उष्णतेने आंबा पिकतो.

हा १०-१५ दिवसाचा अवधी कमी करण्यासाठी रसायने टाकून आंबा, केळी, चिकू इत्यादी फळे पिकविण्याचे एक तंत्र आहे. त्याने ३-४ दिवसात आंबा पिकतो. कॅल्शियम कारबाईड इत्यादी रसायनांचा वापर यासाठी करण्यात येतो. या पद्धतीत रसायनांचा काही अंश फळात जातो. ते मानवी आरोग्यास घातक ठरू शकते. आंबा पिकवण्याच्या दुसऱ्या पद्धतीत आंब्याची कैरी तोडून ती १ ते २ दिवस आंब्याच्या पानांत किवा धान्यात दाबून ठेवतात.

आंब्यामध्ये जीवनसत्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात.आंब्यातील व्हिटॅमिन ए,सी, आपल्या डोळ्यांसाठी चांगले आहेत.आंब्यामध्ये व्हिटॅमिन इ, जस्त, लोह, कॅल्शिअम भरपूर प्रमाणात आहेत.मॅग्नेशियम आणि   पोटॅशिअम असते.

आंबा फळात  पॉलीफेनॉल आणि वनस्पती संयुगे असतात जे अँटिऑक्सिडेंट म्हणून कार्य करतात. मॅंगीफेरिन, कॅटेचिन्स, अँथोसायनिन्स,कॅम्पफेरॉल, रॅमनेटीन, बेंझोइक ऍसिड आणि इतरांसह डझनभर भिन्न प्रकार आहेत.

आंब्या मध्ये अ, क जीवनसत्व मोठ्या प्रमाणांत आहे. तसेच उष्मांक(calories), प्रथिने (proteins ),  तांबे(Copper), पोटॅशिम (Potassium) ,फायबर (Dietary fiber), ब६ जीवनसत्व (Vitamin B6), ब५ जीवनसत्व  (Vitamin B5)  हे घटक देखील थोड्याफार प्रमाणात असतात. संशोधनातून असे निदर्शनात आले आहे की, आंब्यामधील पोषक द्रव्यामुळे आपली पचनशक्ती, रोगप्रतिकारशक्ती वाढते.  

भारतीय संस्कृती मध्ये आंब्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. आंब्याची पानांचा वापर तोरण बनवण्यासाठी केला जातो, जे आपण घरातील दारांना लावू शकतो. मुख्यतः लग्न समारंभात, मंगल कार्यात, सणांच्या दिवशी किंवा शुभप्रसंगी   आंब्याच्या पानांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. कलशामध्ये आंब्याचा टाळा (कलम ने केलेल्या आंब्याची फांदी) नारळाबरोबर ठेवला जातो. उन्हाळ्यापासून पावसाळ्यापर्यंत आंब्याचे अनेक प्रकार बाजारात उपलब्ध असतात. परंतु यापैकी चांगल आणि पिकलेला आंबा कसा शोधायचा?

नैसर्गिकरीत्या पिकविलेल्या आंब्यांना कार्बाईडने पिकविलेल्या आंब्यासारखा पिवळा चकचकीत आकर्षक रंग येत नाही. तो मळकट दिसतो

कृत्रिमरीत्या कार्बाईडमध्ये पिकविलेले आंबे दिसायला आकर्षक पिवळे दिसतात, त्याला दाबल्यानंतर सहजासहजी ते दबत नाहीत. कृत्रिमरीत्या पिकविलेला आंबा नाकाजवळ धरला तर, त्याचा घमघमाट येण्याऐवजी उग्र वास येतो आणि स्वादिष्ट नसतात म्हणजे त्यात गोडवा आलेला नसतो, आंबट लागतात. रस केला तर त्यात साखर टाकावी लागते.मला तर आंबा फळाची रांगोळी काढण्याचा मोह देखील आवरता आवरत नाही.हल्ली मुलं आंबा चोळून खात नाहीत तर छान आंब्याला काप देऊन त्याचे तुकडे करुन खातात.

आमच्या लहानपणी आम्ही मात्र सुरकुत्या पडलेले आंबे पिळून, चोळून खायचो.रात्री झोपताना सुध्दा सुरकुत्या पडलेले आंबे आजीच्या गोष्टी ऐकताना ,खात.खूप मजा यायची .आजीचा  सुरकुत्या पडलेला गौरवर्णी ,पिवळा चेहरा आणि आंबा दोन्हीही सारखेच दिसायचे .आमचेकडे झाकणाचे आंबे म्हणून गम्मत करत खाण्याची खूप मजा यायची.  सुट्टी आणि आंबा खाण्याची मज्जा खूपच वेगळी असते. उन्हाळ्यात पाहुणे आले की आंब्याचा रस हमखास बनवला जातो. मला आठवते आमच्या लहानपणी जर घरात टोपलभर आंबे दिसले म्हणजे,खूप आनंद व्हायचा आम्ही समजून जायचो की, आत्या येणार आणि मग आई तो  बिनपाण्याचा रस बनवणार .एरवी मात्र पाणी घालून रस बनवला जायचा. खास पाहुणे नसले,पाणी घालून केला तरीही त्याचा गोडवा मात्र कायम असायचा. त्यावेळी एवढे कृत्रिम रसायने पिकवण्यासाठी नाही वापरले जायचे.तेव्हा घरीच गवतात आंबे ठेवून पिकवले जायचे.उन्हाळा आणि आंबा खूपच छान कॉम्बिनेशन आहे.आंब्याचे विविध पदार्थ बनवून सुट्टीचा आनंद घेत खाल्ले जातात.खरोखर आंबा हे फळ अमृततुल्य फळ आहे यात काही शंका नाही.म्हणूनच हे फळ सर्वांच्या आवडीचे होऊन फळांच्या राज्याच्या यादीत जाऊन बसले. आहे न 'कुतूहल'आंब्याच्या गोडव्याचे.

🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭




                          @सौ. उज्वला तायडे, अकोट

#कुतूहल आंब्याचे#आंबा#
            संदर्भ-माहिती इंटरनेट


Comments

Popular posts from this blog

हरित श्वासांचा सोहळा........

कुतूहल साडीचे......

कुतूहल.......रात्री उमलणाऱ्या पांढऱ्या रंगांच्या सुगंधी फुलांचे....